
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे वयाच्या ७०व्या वर्षी मुंबईतील बीकेसी येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (९ ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रा. नरके यांचा महाराष्ट्रातील समाजिक चळवळींशी निकटचा संबंध होता. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारसरणीतील अग्रक्रमाचे विचारवंत म्हणून त्यांना ओळखले जात होते. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील समता परिषदेचे ते उपाध्यक्ष देखील होते. या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरले होते.
हरी नरके यांचा शैक्षणिक क्षेत्राशी अत्यंत निकटचा संबंध राहिला. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सोबतच पुण्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलं.
संस्कृत, कन्नड, तेलुगू प्रमाणेच मराठी भाषाही एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून नरके यांनी योगदान दिले आहे.
हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे.
महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.
ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
महात्मा फुले यांची बदनामी – एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे.