गणेशोत्सव काळात बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन

पावसाळी अधिवेशनाचा समारोप होऊन दोन आठवडे उलटत नाहीत तोच केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.पावसाळी अधिवेशनाचा समारोप होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून हे अधिवेशन होणार असून २२ सप्टेंबरपर्यंत पाच दिवस हे अधिवेशन चालेल.
केंद्र सरकारनं तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवातच अधिवेशन बोलावल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेष अधिवेशनकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ५ बैठका होतील, असं जोशी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात होत असलेल्या या विशेष अधिवेशनात सकस चर्चा होईल, असा आशावादही जोशी यांनी व्यक्त केला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन २० रोजी सुरू झालं होतं आणि ११ ऑगस्ट रोजी अधिवेशनाचा समारोप झाला होता.
मणिपूरच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन गाजलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मणिपूरच्या मुद्द्यावर उत्तर द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावही मांडला होता. या अधिवेशनात एकूण २३ विधेयकं संमत करण्यात आली होती.
महाराष्ट्रासह देशभरात १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. नेमकं त्याच काळात अधिवेशन बोलावण्यात आल्यानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे. खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हेच का भाजपचं हिंदुत्व आहे, असा सवाल सावंत यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलेलं असताना विशेष अधिवेशन बोलावण्याचं कारण केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. हे अधिवेशन नवीन संसद भवनात होईल अशीही एक चर्चा आहे. एखादं महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात आणलं जाईल की काय, अशीही एक चर्चा आहे.