शिरूर तालुक्यातील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात वॉटर स्लाइडवरून घसरताना महिलेचा कणा तुटला.
अहिल्यानगर

शिरूर तालुक्यातील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात घडलेल्या गंभीर अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. वॉटर स्लाइडवरून घसरताना झालेल्या दुर्घटनेत ३७ वर्षीय महिलेच्या पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले असून, त्यामुळे तिच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कुटुंबासोबत पर्यटनासाठी केंद्रात गेली होती. वॉटर स्लाइडचा आनंद घेत असताना अचानक तोल जाऊन ती जोरात आपटली. या अपघातात तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिच्या मणक्याला मोठी इजा झाल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणी निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिरूर पोलिस ठाण्यात पर्यटन केंद्राचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पर्यटन केंद्रांतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




