
जिल्हा परिषद शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांना ग्रामपंचायतीमार्फत करमाफी, पट वाढविणाऱ्या शाळांचा सन्मान, अंगणवाडी सक्षमीकरण आणि शाळाजोडणी, इंग्रजी विषयावर भर आणि सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणे, अशा शिफारशी राज्यातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी करण्यात आल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या कमी होत असल्याची दखल शिक्षण विभागाने घेऊन पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक, अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केला होती. या समितीने अभ्यास करून आवश्यक उपाययोजनांचा समावेश असलेला सविस्तर अहवाल शिक्षण विभागाला सादर केला आहे.
या अहवालात दोन टप्प्यांत शिफारशी आहेत. त्यात शाळा सुरू होण्यापूर्वी मार्च ते जून या कालावधीतीत करायच्या उपाययोजना, शाळा सुरू झाल्यावर करायच्या उपाययोजना समाविष्ट आहेत. विविध माध्यमांचा वापर करून पालक, माजी विद्यार्थ्यांना शाळांशी जोडण्यासारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.
मार्च ते जून या कालावधीतील उपाययोजनांमध्ये १६ शिफारशी आहेत. त्यात सर्वेक्षण जनजागृती आणि प्रवेश, शाळापूर्व तयारी, माता-पालक मेळावा, शाळा आपल्या दारी (विशेष गृहभेट), माजी विद्यार्थ्यांमार्फत आवाहन, गुढीपाडवा-पट वाढवा मोहीम, अंगणवाडी सक्षमीकरण आणि शाळाजोडणी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे आवाहन, शैक्षणिक ग्रामसभा, विविध माध्यमांद्वारे जनजागृती, बचत गटामार्फत प्रबोधन, यशस्वी विद्यार्थ्यांचे फलक, प्रवेशासाठी आवाहन करणारी छायाचित्रे, प्रवेशगीत, चित्रफितींचा वापर, ग्रामपंचायतीमार्फत करमाफी मोहीम, शाळा प्रवेशोत्सव, जास्त पटसंख्या वाढविणाऱ्या शाळांचा सन्मान करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.
शाळा सुरू झाल्यावर वर्षभरात राबविण्यासाठीच्या उपक्रमांचाही अहवालात समावेश आहे. स्पर्धा परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रसिद्धी, माजी विद्यार्थी संघामार्फत उपक्रम, पालकांचा व्हॉट्स ॲप समूह, व्हर्च्युअल स्कूल ट्रिप, शिक्षणाची वारी, ग्रंथदिंडी, ग्रामस्थांचे प्रबोधन, शाळा मित्र उपक्रम, पालक मित्र उपक्रम, गुणवत्ता वाढवा पटसंख्या वाढवा, इंग्रजी विषयावर भर देऊन सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, लोकसहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्वातूून भौतिक सुविधा, क्रीडा आणि इतर स्पर्धांत पालकांचा सहभाग, उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान, उन्हाळी सुटीमध्ये स्पर्धांचे आयोजन यांचा त्यात समावेश आहे.




