
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह आठ संचालकांना १० वर्षाहून अधिक काळ कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांना तात्काळ अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सोमवारी विभागीय सह निबंधक कोल्हापूर यांना दिले.
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने बँकिंग सुधारणा अधिनियम लागू केला आहे.यानुसार सहकारी संस्थामध्ये सलग १० वर्षे संचालक पदावर कार्य केल्यानंतर त्यापुढे संबंधित व्यक्तीला संचालक म्हणून काम करता येणार नाही, आणि संचालक पदाच्या निवडणूक लढविण्यासही तो अपात्र ठरेल अशी तरतूद या अधिनियमात आहे. या अधिनियमानुसार जिल्हा बँकेतील आठ विद्यमान संचालक अपात्र ठरतात.
यामध्ये विद्यमान अध्यक्ष नाईक यांच्यासह खासदार विशाल पाटील, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महेद्र लाड, माजी आमदार मोहनराव कदम, सुरेश पाटील व बाळासाहेब होनमोरे यांचा समावेश आहे. या आठजणांचा संचालक म्हणून कार्यकाळ सलग ११ वर्षे पूर्ण झाला असल्याने ते अपात्र ठरतात असे श्री. फराटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
बँकिंग सुधारणा अधिनियमातील तरतुदीनुसार या आठ जणांना संचालक म्हणून काम करण्यास अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत सहकार आयुक्तांनाही देण्यात आली आहे.




