आई सारखी चिडचिड का करते? – डॉ स्वाती गानू यांचा लेख नक्की वाचा..

आजकाल काय झाले आईला कळत नाही. छोट्या छोट्या कारणांनी चिडते, रागावते आणि तिचे डोळे तर सारखे भरून येत असतात. याआधी तिला असं कधी पाहिलं नव्हतं. सारखी काळजी, सारख्या सूचना, वैतागलेली असते. मला कळतच नाही तिच्याशी कसं वागावं .थोडंसं जरी तिच्या मनाविरुद्ध झालं तरी खूप ऐकवते. असं वाटतं घरातून बाहेरच जावं.
कौन्सिलिंगला आलेली अमोला तिच्या सेशनमध्ये सांगत होती.टीनएजर मुलं जेव्हा काऊन्सलिंगसाठी येतात त्यावेळेला त्यांच्याकडून विशेषत्वाने आईबद्दलच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतात. आईचं आणि त्यांचं पटत नाही. आईच्या वागण्यात खूप बदल झाला आहे. ती आमच्या डोक्यावर हेलिकॉप्टरसारखी फिरत असते. खूप नियम आणि शिस्त लावायला जाते. हे कर आणि आत्ताच कर असं सांगते. कटकट वाटते. थोडं कुल रहायला काय हरकत आहे? अशा प्रकारच्या तक्रारी मुलांकडून येत असतात.
मुलं ज्या वेळेला किशोरावस्थेत म्हणजेच टीन एजमध्ये येतात तेव्हा साधारण तेरा ते चौदा वर्षाची असतात आणि त्यावेळेला आई बहुतांशी ३५ ते ५0 या वयात असते. दोघांमध्येही हार्मोनल बदल होत असतात.
आई मेनोपॉज काळातून जात असते त्यामुळे शरीरातील बदलाबरोबरच दोघांमध्येही भावनिक आणि मानसिक बदलांची दोलायमान अवस्था असते.त्याचा आई आणि वयात येऊ पाहणाऱ्या मुलांच्या नात्यावर बराच परिणाम होत असतो. दोघांमधील अंतर वाढत जाते.
मुलांना एकटं राहायला आवडतं. खरं म्हणजे त्यांचा हा काळ स्व शोध घेण्याचा असतो. स्वतःच्या विचारांना, क्षमतांना तपासून पाहण्याचा असतो. विविध प्रकारचे अनुभव घेऊन पाहण्याचा असतो, आणि नेमकी आई आपल्या मुलाला जपण्याच्या दृष्टीने जास्तच सजग झालेली असते. आजूबाजूच्या जगात आपल्या मुलाला धोका आहे.
कुठल्याही प्रकारच्या अडचणीत आपलं मूल सापडू नये, त्याला अजून पुरेसं कळत नाही असं तिला वाटत असतं आणि त्यामुळेच तिच्या मनामध्ये सतत काळजी, चिंता, असहायता अशा अनेक भावनांचा कल्लोळ उडालेला असतो. जरा काही झालं की जखमेवरची खपली निघावी तसं तिचं मन हळवं होऊन जातं. पण तिचं हे हळवेपण, भावनाशील होणं इतरांना समजत नाही आणि नेमकं याच गोष्टीचं तिला जास्त वाईट वाटत राहतं.
ज्या वेळेला मुलं मोठी होत आहेत, त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळावा असं तिला वाटतं तेव्हाच नेमकी मुलं तिच्यापासून दूर जायला लागलेली असतात. खरं म्हणजे त्याचं आई वरचं प्रेम कमी झालेलं असतं असं नाही पण त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य आणि प्रायव्हसी ही जास्त प्रिय वाटायला लागलेली असते. मुलं आता कुटुंबापासून बऱ्यापैकी सुटी व्हायला लागतात आणि त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर पहिल्या नंबर वर त्यांचे मित्र असतात .त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्यापासून जेव्हा त्यांना अडवलं जातं, अशा लोकांपासून दूर राहावं असं त्यांना मनापासून वाटतं आणि नकळत आई आणि मुलांमध्ये दरी वाढत जाते.
याच वेळेला नवरा देखील त्याच्या करिअरमध्ये व्यस्त असतो कारण त्याचीही उमेदीची वर्ष असतात. आणि स्त्री या नाजूक मनोवस्थेत एकटी पडते.
पण ही एक अवस्था असते दोघांसाठीही. त्यामुळे हा काळ कठीण असला तरी सांभाळता नक्कीच येऊ शकतो.
मेनोपॉजमध्ये फक्त शरीरातच बदल होत नाहीत, तर भावनिक बदलही खूप जाणवतात. अनेक स्त्रियांना असं वाटतं की त्या स्वतःलाच ओळखू शकत नाहीत.एक दिवस त्या उत्साही आणि शांत असतात, आणि दुसऱ्या दिवशी अगदी छोट्या गोष्टींनी रडू येते किंवा चिडचिड होते.
सगळ्यांना आणि अगदी त्यांनाही असं वाटतं की आपण“जास्त संवेदनशील” असल्यामुळे हे होतंय पण असं नाही. हा मेंदूमध्ये होणारा खरा बदल आहे. हार्मोन्स मूड आणि विचार करण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतात.
आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सामान्य असले तरी ते सोपे नसते.आजकाल बर्याच महिला सिंगल मदर आहेत..
पालक म्हणून जबाबदाऱ्या थांबत नाहीत. उलट मुले किशोरवयात असतील तर त्यांच्याही भावना तीव्र असतात. जणू हार्मोन्सचे वादळच असतं आणि अशा वेळी प्रॉब्लेम वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पालकत्व आणि हार्मोन्सची टक्कर सुरू असते.
मुलाने असं विचारलं की आई अलीकडे तुझा मूड सारखा बदलत का असतो? हा एक प्रश्न ज्याने आई ट्रिगर होते.हीच ती जागा—जिथे मेनोपॉज आणि पालकत्व एकत्र येतात. आणि विशेषतः जेव्हा त्या किशोरवयीन मुलांना वाढवत असतात, जे स्वतःच हार्मोन्सच्या बदलातून जात असतात. ही अवस्था म्हणजे एकीकडे पालकत्व सांभाळणं आणि दुसरीकडे स्वतःच्या मेनोपॉजला सांभाळणं.
दोन पूर्ण वेळच्या जबाबदाऱ्या, नोकरी, बिझनेस आणि एक थकलेली मनःस्थिती अशी स्त्रियांची अवस्था असते..
पालकत्व म्हणजे सतत भावनांवर नियंत्रण ठेवणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि खूप सहनशक्ती ठेवणे. त्यात मेनोपॉजची भर—हार्मोन्स सतत बदलत आहेत, झोप नीट होत नाही, आवाज आणि गोंधळ सहन करणे कठीण होते—मग स्वतःवर ताबा सुटल्यासारखे वाटणे साहजिक आहे.
त्यातच मूलही किशोरवयातून जात असते. मुलांचाही मूड काही मिनिटांत बदलतो.कधी लाडिक, कधी भांडखोर. तुम्ही दोघेही संवेदनशील, दोघेही थोडे चिडचिडे, आणि “आत्ता काय झाले?” हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असता.
तुम्ही त्यांच्या रडारडी किंवा राग सांभाळत असता.आणि त्याच वेळी स्वतःच्याही भावना सांभाळत असता. काही दिवस असे वाटते की घरात कुणीच पूर्णपणे स्थिर नाही. तुम्हीही नाही. तुम्हाला वाटतं की तुमच्या हातून मुलांचा कंट्रोल, कुटुंबावरचा कंट्रोल सुटत चालला आहे पण
हे “नियंत्रण गमावणे” नाही. तर हा हार्मोन्सच्या बदलांचा खरा परिणाम आहे. ‘इस्ट्रोजन’ हा हार्मोन, मूड आणि विचार करण्याच्या क्षमतेसाठी जबाबदार असतो.
या काळात हार्मोन्समध्ये (इस्ट्रोजेन) घट होते. हॉट फ्लशेस येतात, झोप लागत नाही, चिडचिड होते, राग येतो, चिंता वाटते, थकवा येतो, मन उदास होतं, लक्ष केंद्रित होत नाही.
हे बदल स्त्रीसाठी नवीन आणि बरेच त्रासदायक असतात. त्यामुळे तिच्या मन:स्थितीत चढ-उतार होतात.
दुसरीकडे किशोरवय (11 ते 19 वर्षे) हा मुलांसाठीही बदलांचा काळ असतो. त्यांच्या शरीरात व मनातही हार्मोनल बदल होतात. त्यामुळे तेही कधी कधी चिडचिडे, हट्टी किंवा भावनिक होतात.
जेव्हा आई रजोनिवृत्तीच्या काळात असते आणि मुलं किशोरवयात असतात, तेव्हा दोघांच्याही मन:स्थितीत बदल होत असल्याने गैरसमज वाढू शकतात.
नेमकं काय होतं या काळात तर
1) छोट्या गोष्टींवरून वाद होतात.
2) मुलं आपलं ऐकत नाहीत आईला वाटतं.
3) आई जास्त रागावते असं मुलांना वाटतं.
4) घरातील वातावरण तणावपूर्ण होतं.
अशावेळी काय करायला हवं
1) आई आणि मुलांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे महत्त्वाचे आहे. संवाद करणे आवश्यक आहे. दोघेही बदलांच्या टप्प्यात आहेत, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
2) एकमेकांना समजून घ्या.शांत राहण्याचा प्रयत्न करा. रागाच्या वेळी लगेच प्रतिक्रिया न देता थोडा वेळ घ्या.
3) आरोग्याची काळजी घ्या. योग्य आहार, व्यायाम, योग आणि ध्यान उपयुक्त ठरेल.
4) वैद्यकीय सल्ला घ्या. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या काळात इतर कुटुंबीयांनीही समजून घेणे आवश्यक आहे. त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे कारण स्त्रीला या काळात मानसिक आणि भावनिक आधार मिळाला तर शारीरिक बदलाला ती समर्थपणे सामोरी जाऊ शकते.
मैत्रिणींनो जेव्हा भावना अचानक वाढतात—राग, दुःख किंवा चिडचिड—तेव्हा सर्वात उपयोगी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या भावनेला नाव देणं म्हणजे त्या वेळेला नेमकं काय वाटत आहे याबद्दल तुम्हाला स्वतःला कळायला लागेल. कारण राग हा मुलांवर नसतो तर शरीरातील बदलांमुळे आणि मनातील आंदोलनामुळे येत असतो.
1) भावनेला नाव दिल्याने मेंदूचा शांत आणि विचार करणारा भाग सक्रिय होतो. त्यामुळे भावना लगेच नाहीशा होत नाहीत, पण आपण विचार करून प्रतिसाद देऊ शकतो. हळूहळू यामुळे भावना समजून घेण्याची सवय लागते—आणि मुलांसाठीही हा चांगला आदर्श ठरतो. प्रतिक्रिया देण्याआधी स्वतःला शांत करा.
2) पालकत्वाच्या प्रत्येक क्षणामागे तुमची मानसिक अवस्था काम करत असते. जर तुम्ही खूप तणावात असाल, तर शांत राहणे आणि नीट बोलणे कठीण होते. ही तुमची चूक नाही.हे शरीराचं नैसर्गिक काम आहे.
3)दररोज एक छोटा “रीसेट” वेळ ठेवा. काही मिनिटेही पुरेशी असतात:
4) थोडावेळ बाहेर जा आणि पाय जमिनीवर टेकलेले जाणवा.
5) चेहऱ्यावर थंड पाणी मारा खरंच यामुळे मेंदू शांत होतो.
6) हातांच्या तळव्यांना एकमेकांवर दाबा आणि ३ खोल श्वास घ्या.
7) छातीवर हात ठेवा आणि म्हणा, “मी ठीक आहे. हे कठीण आहे, पण मी ठीक आहे.”
8) नेहमी शांत राहणे गरजेचे नाही. पण अशा छोट्या सवयींमुळे तुम्ही लवकर सावरू शकता.
9) छोट्या विश्रांतीचे क्षण तयार करा
10) स्वतःची काळजी घेणे म्हणजे मोठा सुट्टीचा प्लॅन किंवा स्पा दिवसच असतो असे नाही. खरंच जादू छोट्या क्षणांमध्ये घडते.
11) मुलांना सोडल्यानंतर गाडीत १० मिनिटे बसून तुमच्या आवडीचे गाणे ऐकणे
12) बाथरूमचा दरवाजा लावून पॉडकास्ट ऐकू शकता.
13) हे छोटे क्षण तुमच्या मनाला सांगतात: “तुला विश्रांती घेण्याचा हक्क आहे. सतत काम करत राहण्याची गरज नाही.”
14) शरीराची काळजी घेतल्याने भावनिक स्थितीत मोठा फरक पडतो.
15) झोपण्याआधी शांत होण्याची छोटी सवय लावा.
16) हलका व्यायाम जसे की स्ट्रेचिंग, चालणे ताण कमी करते.
17) रक्तातील साखर स्थिर ठेवा—यामुळे मूड स्विंग कमी होतात.
18) शरीरात पाण्याची कमतरता असली तर चिडचिड आणि थकवा वाढतो. सगळी कामे पूर्ण केल्यावरच विश्रांती घ्यायची, असे नाही. दिवसभर संयम ठेवला म्हणूनच रात्री स्वतःवर प्रेम करायचे, असेही नाही. हा काळ तुमच्याकडून खूप काही मागतोय म्हणून तुम्हीही स्वतःसाठी थोडे मागू शकता.
19) छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. जशी माया तुम्ही मुलांवर करता, तशी थोडी माया स्वतःवरही करा.
समतोल म्हणजे परिपूर्णता नाही.तर हळूहळू सावरत पुढे जाणे आहे.रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. त्याच वेळी किशोरवयीन मुलांसोबत नातेसंबंध जपणे हे थोडे आव्हानात्मक असू शकते. पण प्रेम, संयम, समज आणि संवाद यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि शांत ठेवता येते.
हा काळ कठीण असला तरी तो तात्पुरता आहे. योग्य समज आणि सहकार्याने आई-मुलांमधील नाते अधिक मजबूत होऊ शकते.




