शिवराजाभिषेकदिनी पाडण्यात आलेले छत्रपतींची नाणी..यावर माहितीपूर्ण लेख
श्री अभिजित का.भुजबळ. नाणी अभ्यासक,राहणार - पुणे यांनी लिहीलंय..

नमस्कार माझ्या सर्व वाचक मंडळींनो.
सर्व प्रथम महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
आज राजाभिषेक सोहळा निमित्त असल्यामुळे आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत तो विषय म्हणजे “शिवराई”. हो शिवराई, जे इतिहासप्रेमी असतील त्यांना हा शब्द काही नवखा नसेल पण जे या शब्दाशी नवखे आहेत त्यांसाठी हा एक छोटा पण माहिती पूर्वक हा विषय मी लिहीत आहे. अर्थात छोट्या तोंडी मोठा घास घेत आहे.
“शिवराई” म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाणे. इतिहासामध्ये चलनाची सुरवात ही खूप वर्षापूर्वी झालेली दिसून येते.
शिवराई चा अभ्यास करताना आपल्याला अनेक घटकांचा, अनेक कालखंडाचा अभ्यास करावा लागतो कारण अजूनसुद्धा शिवराई च्या विविध प्रकारां बद्दल अजूनही इतिहासकारांना मध्ये एकमत आढळत नाही. कारण कागद पत्रांच्या अभावामुळे ही नाणी कोठे, केव्हा आणि किती स्वरूपात छापल्या गेल्या याचे अजून तरी लिखित स्वरूपात पुरावे आढळत नाहीत बहुदा त्यावर अभ्यास होत नाही. त्यामुळे केवळ नाण्याच्या स्वरूपावरून व धातू वरूनच त्याचे अभ्यासपूर्व महत्व लक्षात घ्यावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजे १६७४ मध्ये “शिवराई” या नाण्याची निर्मिती झाली. ही नाणी २ धातू प्रकारात पाडलेली दिसत. एक म्हणजे सोने आणि दुसरे म्हणजे तांबे. विशेष म्हणजे ही नाणी आपल्याला देवनागरी लिपीत छापलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यावरून आपल्याला महाराज्यांच्या आपल्या भाषेवरील असलेले प्रेम दिसून येते.
सोन्याच्या धातू मध्ये पाडलेल्या नाण्याला शिवराई “होन” असे म्हणतात तर तांब्याच्या नाण्याला तांब्याची “शिवराई” असे म्हंटले जाते.
होन (सुवर्ण शिवराई) :-
शिवाजी महाराजानी पाडलेले होन हे वजनाने २.७२ ग्रॅम चे असत तर त्याचे व्यास १.३ सेमी होते व त्यावर बिंदुमय वर्तुळामध्ये नाण्याच्या पुढील बाजूला श्री/राजा/शिव व मागील बाजूवर छत्र/पती असे मजकूर आहेत. हे होन सध्या मात्र खूपच दुर्मिळ झालेले आहेत. संपूर्ण भारता मध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके च सध्या शिल्लक आहेत व आपल्याला ते संग्रहालयात व काही नाणी संग्रहांकडे पाहायला मिळतात. सोन्याच्या नाण्यांचा वापर मुख्यतः सरकार, बँकर्स, सरदार, खानदानी कुटुंबे इत्यादी यांच्या पैशाच्या व्यवहारासाठी केला जात असे तर तांब्याची नाणी दैनंदिन जीवनात वापरात होती.
शिवकाळात शिवकालीन होन या नानेप्रकरास मोठे महत्व होते परंतु नंतर नंतर १८ व्या शतकाच्या शेवटी व १९ व्यां शतकापर्यंत या नाण्यांचे अस्थित्व राहिले नाही.
शिवराई (तांब्याची नाणी)
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पाडण्यात आलेले दुसरे नाणे म्हणजे तांब्याची शिवराई. होन वर शिवराई त्यावेळेस रायगडा वर छापण्यात आल्या होत्या. तांब्याच्या नाण्यांचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम एवढे होते व त्याचा व्यास हा २.५ सेमी होता. कालांतराने या नाण्यांच्या वजना मध्ये व आकारामध्ये काळानुरूप बदल होत गेले. या तांब्याच्या शिवराई नाण्यान मध्ये जवळपास १५० हून अधिक प्रकार छापलेले दिसतात. हे तांब्याचे चलन जनसामाणन्यांच्या वापरातील चलन असल्यामुळे हे नाणे १६ ते १९ व्या शतकापर्यंत चलनात होते. या नाण्यावर देखील बिंदुमय वर्तुळात श्री/राजा/शिव व मागील बाजूस छत्र/पती असा मजकूर लिहिलेला दिसून येतो. हे नाणे शिवकलापासून ते ब्रिटिश काळापर्यंत चलनात असल्यामुळे या नाण्या मध्ये अनेक बदल व अनेक प्रकारे छापलेले दिसतात.
अनेक बदल या अर्थाने म्हणजे लिखाणाच्या मजकुरामधील बदल. नाण्याच्या पुढील बाजूवर काळानुसार मजकुरामध्ये बदल होताना दिसतात तर नाण्याच्या मागील बाजूवर तो दिसत नाही.
उदा :- पुढील बाजूवर
श्री/राजा/शिव
श्री/राजा/शंभू
श्री/राजा/राम
श्री/राजा/शाहु
श्री/राजा/साव
श्री/राजा
तारखा छापलेल्या (सन) शिवराई, दु-दांडी शिवराई.
अनेक प्रकार म्हणजे :- वरील मजकूराबरोबरच नाण्यावर वेगवेगळी चिन्हे छापलेले दिसतात.
उदा. :- सूर्य, चंद्र, फुल, पान, त्रिशूळ, अंकुश, तलवार, पिंड, परशू, बिंदुमय वर्तुळ प्रकारातील बदल, असे अनेक प्रकार नाण्यावर असतात.
१७ शे ते १८ शे या कालखंडात मराठ्यांचा विस्तार संपूर्ण भारत भर वाढत असल्यामुळे अतिरिक्त नाण्याची नड भासत असल्यामुळे १८ व्या शतकापर्यंत मराठांच्या एकूण ११७ टांकसाळी (छापखाने) होत्या त्यामुळे आपल्याला शिवराई मध्ये अनेक प्रकार पडलेले पहावयास मिळतात.
शिवराई नाणे हे हाताने बनविले जात होते. “Die struck” या पद्धतीचा वापर करून ही नाणी पाडली जायची. Die struck पद्धत म्हणजे एक छाप (Die) खालच्या बाजूला तर दुसरा छाप (die) वरच्याबजुला धरून मध्ये धातूचा तुकडा ठेवून हातोड्याच्या साह्याने त्यावर घाव घालून हे नाणे बनवण्यात येत असत.
त्यामुळे शिवराई हे फक्त नाण नसुन ती एक सुरवात होती एका छोट्याश्या मुलकाचे रूपांतर स्वराज्यात व त्याचे रूपांतर एका मराठा साम्राज्यात करण्याची आणि ती एक ओळख निर्मिती होती मराठा अर्थव्यस्थेची.
शिवराई चलन आज इतिहास जमा झाले असले तरी त्या विषाई चा अभ्यास हा खरंच इतिहास प्रेमिंच्या व नाणी संग्रहाच्या दृष्टीने या काळात देखील अतिशय महत्वपूर्ण ठरतो.
हा विषय खूप अभ्यासपूर्वक व मोठा असल्यामुळे काही मोजक्याच गोष्टी या लेखात घेतला आहे त्यामुळे लेखाच्या शेवटी परत एकदा मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि अश्या करतो की आपल्याला हा लेख आवडलेला असेल..