शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, गुरांनाही खायला देत नाही अशा सडलेल्या भाजीपाल्याचं जेवण मुलांना
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मुलांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण देऊन मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी काल अचानक भेट दिल्यानंतर याठिकाणी अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांनी शाळेला अचानक भेट दिली. यात या निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः आपण गुरांना खाऊ नाही घालत अशा सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण बनवले जात असल्याचे याठिकाणी समोर आले. कांदा सडलेला, कोबी किडलेली, बिट सडलेले, गिलके पिकलेले, तांदूळ खराब असल्याने यापासून बनवलेले जेवण विद्यार्थ्यांना दिले जात असल्याची गंभीर बाब पाहणीत समोर आली.
शाळेतील शौचालय आणि स्नानगृहं यांचे दरवाजे तुटलेले आढळले. तसेच बेड ज्या साईजचे होते त्यावर असणाऱ्या गाद्या छोट्या होत्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे शाळेच्या शैक्षणिक दर्जा अतिशय खालावलेला दिसून आला. आमदार मंगेश चव्हाण यांनी काही मुलांना समोर बोलावून त्यांना अभ्यास कसा आहे याची पडताळणी केली यात दहावी मधील विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नव्हते तर सहावीतल्या विद्यार्थ्यांला आपल्या आईचे नाव लिहिता आले नाही.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय चांगल्या सुविधा असणारी शाळा उभी केली आहे, येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या फक्त जेवणावर महिन्याला १८०० रुपये खर्च शासन देते. यासोबतच शिक्षकांना लाखोंचा पगार, सोयी सुविधा शासन देते, पालक देखील मोठ्या अपेक्षेने मुलांना याठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात.
मात्र, इकडे ठेकेदार आणि प्रशासनाची भ्रष्ट युती विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करत आहे. तसेच, शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याने भावी पिढीचे देखील नुकसान होत आहे असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.