मुसळधार पाऊस, पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. आजचा दिवस देखील राज्यातील अनेक शहरं आणि जिल्ह्यांसाठी महत्वाचा असणार आहे कारण हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहारासह राज्यातील १३ शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनामार्फत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये, गरज असल्यास त्यांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरीच राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी सोमवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार वाऱ्यांचाही इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्णय घेतला. मावळ आणि लोणावळा शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आदेश जारी केले. लोणावळ्यातील अंगणवाडी, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक सर्व शाळांना आज सुट्टी असणार आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी ६ जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, पाणी साचणे व पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आज महानगरपालिका हद्दीतील सर्व राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई तसेच इतर सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.




