आनंदबन वाॅटर पार्क मधे खेळण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी परिसरातील एका वॉटर पार्कमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (18 मे) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजविर भारत पवार (रा. आलगुडवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे मयत बालकाचे नाव आहे.
सोमवारी सकाळी राजविर हा आपल्या आई व इतर नातेवाईकांसोबत निंबोडी येथील बेरड यांच्या वॉटर पार्कमध्ये गेला होता. दरम्यान, खेळत असताना तो पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने त्याला खासगी वाहनातून उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याबाबत जिल्हा शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी माहिती दिल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार व त्यांच्या पथकाने भेट दिली. याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.



